Saturday, June 3, 2017

राष्ट्र उभारणी करणारी राष्ट्रमाता अहिल्या

Inline image 2

अहिल्यादेवी होळकर यांची २९२ वी जयंती नुकतीच ३१ मे रोजी देशभर उत्साहाने साजरी केली गेली. अहिल्यादेवींनी देशभर केलेली निर्माण कार्ये आजही प्रेरक आहेत. खरे तर शेकडो राज्यकर्त्यांत वाटल्या गेलेल्या भारत देशाला त्यांनी मंदिरे, घाट, रस्ते, धर्मशाळा आणि बारवांच्या माध्यमातून जोडण्याचे अचाट कार्य केले. आपल्या संस्थानाच्या बाहेर पाहण्याची तत्कालीन राज्यकर्त्यांची प्रवृत्ती नसतांनाही त्यांनी फक्त आपल्या होळकर संस्थानाचा विचार न करता सोमनाथ ते केदारनाथ आणि दक्षीणेत पार रामेश्वरमपर्यंतच्या भुभागांत आपली निर्माण कार्ये केली. त्याबद्दल त्यांचा आजही सन्मान केला जातो व त्यांना त्यासाठी "राष्ट्रमाता" असेही म्हटले जाते. परंतू इतिहासकारांच्या नजरेतून सुटलेला भाग म्हणजे बहुसंख्य प्रदेशांतील राज्यकर्ते मुस्लिम असतांनाही अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यात हिंदू मंदिरे उभारायच्या परवानग्या कशा मिळवल्या हा. यातील काही मंदिरे इस्लामी आक्रमकांनी उध्वस्त केलेली होती. त्यानिकटच अहिल्यादेवींनी काही मंदिरे उभारली आहेत. त्यावेळीसही राज्यकर्ते मुस्लिमच होते. केवळ धनाच्या जोरावर व दानशुरता व धार्मिकता आहे या बळावर ही मंदिरे उभारणे अत्यंत अशक्य असेच कार्य होते हे उघड आहे.

सोमनाथ हे जुनागढ राज्याच्या सीमांतर्गत होते. तेथे बाबी (अथवा बाबई) हे पठाण घराणे राज्य करत होते. जेंव्हा मंदिर बांधले तेंव्हा मोहंमद महाबत खांजी (पहिला) राज्य करीत होता. या घराण्याने मोगल दरबाराशी नेहमीच सख्य ठेवलेले होते. पेशवा दरबारशी त्याचे संबंध चांगले नव्हते. पण सोमनाथ हे भारताचा मानबिंदू मानले गेलेले धर्मस्थान. इतिहासात ते अनेकवेळा उध्वस्त केले गेलेले आहे. औरंगजेबानेही तर ते पुरते नष्ट करण्याचा आदेश दिला होता. अशा स्थितीत तेथेच नसले तर त्याच्याच निकट त्या मानबिंदुची पुनर्स्थापना करणे व तेही मुस्लिम शासक असतांना तसे अशक्यच होते.

तीच बाब अयोध्येची. अहिल्याबाईंनी अयोध्येला राममंदिर बांधले तेंव्हा आसफौद्दुअला अमानी हा तेथला सुभेदार होता. काशी विश्वनाथ त्याच्याच अंकित होते. मल्हारराव होळकर यांनी काशी विश्वनाथाच्या मंदिराला उध्वस्त करून तेथे बांधल्या गेलेल्या मशिदीला पाडायचा विचारही केला होता. पण काशीतील तेलंगी ब्राह्मणांनी "तुम्ही निघून जाल आणि पातशहा आमची कत्तल करेन" अशी भिती व्यक्त करून सर्व मराठा सरदारांकडे गा-हाणे घातले म्हणून ती मशिद मल्हाररावांनी पाडली नव्हती. अर्थात त्यावेळीस मल्हाररावांकडे प्रचंड सैन्याचे बळ होते आणि त्यांचा लष्करी दबदबा मोठा होता. कालकादेवी यात्रा प्रकरणात आपण किती टोकाला जावू शकतो हे त्यांनी दाखवून दिले होते. पण अहिल्याबाई सत्तेवर आल्यानंतरची देशातील राजकारणाची दिशा बदलली होती. अंदाधुंदी जास्त वाढलेली होती. अहिल्याबाईंनी या मशिदीला लागुनच जागा मिळवून तेथे काशी विश्वेश्वराची पुनर्स्थापना केली. अयोध्येचे राममंदिर काय किंवा काशी विश्वनाथ काय, ही बांधकामे करणे अहिल्याबाईंनी कसे शक्य केले हा इतिहास थक्क करणारा आहे.

अहिल्यादेवींनी देशभरातील सर्व शासकांच्या दरबारांत आपले वकील नियुक्त केलेले होते. प्रत्येक शासकाशी चांगले राजकीय संबंध तयार करण्यासाठी त्यांनी आधी आपल्या शासनकाळातील आरंभीची पाच-सहा वर्ष खर्च केली. मल्हाररावांनीच त्यांना राजकारणाचे धडे दिले असल्याने त्या जवळजवळ प्रत्येक शासक व मुत्सद्दी यांना चांगल्याच ओळखत होत्या. त्यांचा या शासकांशी दांडगा पत्रव्यवहार जसा होता तसाच आपल्या वकीलांमार्फत होणा-या पत्रव्यवहारातून त्या सगळीकदच्या वित्तंबातम्याही मिळवत असत. पेशव्यांनाही त्यांनी इंग्रजांबद्दलही प्रथम सावधान केले ते या त्यांच्याजवळील माहितीमुळेच!

सोमनाथच्या बाबतीत त्यांनी मुत्सद्दीपणा, आपली प्रतिमा आणि पैशाचा सढळ हस्ते उपयोग केला. तुकोजी होळकर व महादजी शिंदेंच्या प्रबळ सेनेच्या दबावाचा वापर करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे मोहंमद खांजीने अहिल्याबाईंना सोमनाथ मंदिर उभारायला परवानगी दिली. आसफौद्दूलाच्या बाबतीत त्यांनी मल्हाररावांच्या नांवाच्या दबदब्याचा व दिल्ली दरबारातील वजनाचा उपयोग करून घेतला. अयोध्येत त्यांनी भैरव मंदिरासारखी अजुन तीन मंदिरे तर बांधलीच पण शरयु घाटाचीही बांधणी केली. राम जन्मभुमी अमुकच ठिकाण आहे अशी काही समजूत त्याकाळी अस्तित्वात नसल्याने बाबरी मशिदीशेजारीच नवे राम मंदिर बांधण्याची त्यांना आवश्यकता पडली नाही. तसे असते तर्व त्यांनी तेही केले असते हे सोमनाथ व काशी विश्वेश्वरावरुनच सिद्ध होते. मराठ्यांशी सतत युद्धरत राहणा-या आणि हिंदुद्वेष्टा म्हणून प्रतिमा बनवण्यात आलेल्या टिपू सुलतानानेही अहिल्यादेवींना त्याच्याही राज्यात धर्मकार्ये करू दिली. एवढेच नव्हे तर त्यांना "तत्वज्ञ महाराणी" असेही संबोधले.

त्या काळात मंदिरे, रस्ते, घाट, धर्मशाळा याच देशभरातील लोकांना आत्मियतेने जोडण्याचे साधन होत्या. कोठेही इस्लामचा उपमर्द होणार नाही हे पहात त्यांनी राष्ट्रीय मानबिंदुही उभारले. अहिल्यादेवींचा व्यक्तीगत अंगरक्षक दलाचा प्रमुख शरीफभाई होता. त्यांचे वकीलही दुरदृष्टीचे व अहिल्याबाइंशी इमानाने वागत हे पत्रव्यवहारावरुनच स्पष्ट होते. राजा-रजवाड्यांशी, मग ते हिंदू असोत की मुस्लिम, अहिल्यादेवी राजकीय संबंध महेश्वरावरून न हलताही आत्मियतेचे ठेवू शकल्या त्या यामुळेच. यात त्यांचा रत्नपारखीपणाही दिसतो. त्या सामान्य धार्मिक महिला नव्हत्या तर उच्च कोटीचे नैतिक सामर्थ्य असणा-या महाराणी होत्या.

अहिल्यादेवींच्या प्रत्येक निर्माणकार्यामागे एक कथा आहे. मुत्सद्दीपणा, नैतिक सामर्थ्य आणि गरज पडली तर दबावही ही सारी अस्त्रे त्यांनी वापरली ती देशाच्या कानाकोप-यात एक राष्ट्रीयत्वाची भावना जोपासण्यासाठी. त्यासाठी प्रसंगी पेशव्यांशीही मतभेद करून घेतले. त्यांचे दृष्टी नुसती विशाल नव्हती तर प्रत्यक्ष कृती करण्याची त्यांची उमेद होती. त्यासाठी त्यांनी आपल्या व्यक्तीगत संपत्तीवर सत्तेत येताच तुळशीपत्र ठेवले होते. तरीही त्या संपत्तीचा मोह, मग तो अगदी त्यांच्या तत्कालिक युद्ध गरजांसाठी का असेना, अगदी राघोबादादांपासून महादजी शिंदेंनाही अधून मधून पडेच. पण अहिल्यादेवी त्यांनाही तोंड देत आपले कौशल्य पुरेपूर निर्मितीत लावत राहिल्या. त्यामुळे त्यांना ख-या अर्थाने राष्ट्रमाता म्हणने उचितच होईल.

-संजय सोनवणी

Wednesday, May 31, 2017

मराठी कविता - ​धनगर​पुत्र आद्य चक्रवर्ती​ ​सम्राट चंद्रगुप्त मौर्य ​ ​


। सम्राट चंद्रगुप्त मौर्य । मराठी कविता । मिलिंद डोंबाळे (देशमुख) ।
। Samrat Chandragupta Maurya । Marathi Kavita । Milind Dombale (Deshmukh) ।


Saturday, January 14, 2017

यंत्रमानव व कृत्रीम प्रज्ञेचे आव्हान!

Image result for artificial intelligence

समाज कसा असणार हे समाजात बुद्धीवंत, प्रज्ञावंत किती अहेत व ते कोणत्या दिशेने विचार करतात यावर जेवढे अवलंबुन असते तेवढेच ते अन्य राष्ट्रे कोणत्या दिशेने प्रगती करत जातात यावरही अवलंबुन असते. परकीय प्रभावाने समाजाची दिशा ठरने अनेकदा अडचणीचे असते कारण मुळात त्यांच्या प्रगतीचा मुलगाभा न समजताच अनुकरणातुन ही दिशा नाइलाजाने स्विकारावी लागत असते. आपल्याला तसे होणे परवडणारे नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

प्रगत राष्ट्रांत सध्या जोरदार चर्चा चालु आहे ती श्रमिकांची व कनिष्ठ कार्यांसाठी लागणा-या कर्मचा-यांची जागा यंत्रमानवांनी घेणे कितपत संयुक्तिक व नैतिक आहे यावर. औषधी उत्पादन, शेतकी ते अनेक रसायनी उद्योगांत अवाढव्य कारखाने यंत्रमानवांच्या वापराला पसंती देतांना दिसून येतात. काहींनी त्यांचा वापर सुरुही केला आहे. त्यात आता भर पदली आहे ती म्हणजे "कृत्रीम बुद्धीमत्ता" (Artificial Intelligence) या वेगाने विकसित होत चाललेल्य संकल्पनेची. येथे मानवी मेंदुची जागाच संगणक कसे घेतील याचा प्रयत्न सुरु आहे. संगणक सध्या माहितीचे विश्लेशन करतो पण निर्णय घेत नाही. आवाज ऐकुन त्याचे भावात्मक विश्लेषन करत नाही. वासही घेऊ शकत नाही कि पर्यावरणीय बदलांना प्रतिसादही देत नाही. विचार करणे हे मानवाचे महत्वाचे वैशिष्ट्य. पण सध्याचे संगणक विचार करु शकत नाही. 

पण संगणकांनी तसे करावे...किंबहुना संगणकांनी मनुष्याचीच जागा घ्यावी यासाठी प्रयत्न होत आहेत. यासाठी पुंजयामिकीय संगणकप्रणाली (Quantum mechanic based system) बनवता येईल अशी संकल्पना मी १९९८ साली बेंगलोर येथे एका कार्यशाळेत मांडली होती. हे काम माझ्या हातून झाले नसले तरी आता जगात याही दिशेने प्रयत्न सुरु आहेत व त्याला कधी ना कधी यश मिळेल यातही शंका नाही. शिवाय मानवी मेंदू व संगणकीय चिप्स यांचा संकर करुनही अधिक प्रगत अर्धयंत्रमानव बनवता येईल काय या शक्यतेवर केवळ विज्ञानिकाच नव्हे तर शास्त्रज्ञही विचार करत आहेत. म्हणजेच माणसाची जागा संगणक घेऊ लागतील अशी शक्यता येत्या २०-२५ वर्षांत नाकारता येत नाही. 

समजा उद्या सर्वच उद्योगांनी यंत्रमानव वापरायला सुरुवात केली व पगारी नोकरांची गरजच संपवली तर काय हाहा:कार उडु शकतो याची आपण कल्पना करु शकतो. कृत्रीम बुद्धीमत्तेच्या मानवसदृष संगणक-मानवाची निर्मिती झालीच तर मग तर मनुष्याचीच गरज राहणार नाही कि काय अशीही भिती आहेच. या सर्वांत कायदा महत्वाचा रोल बजावत प्रायोगिक पातळीवर सोडले तर अन्यत्र असे घडू दिले जानार नाही हा आपला आशावाद आहे. रोबोटिक्सचा उपयोग आजच अनेक क्षेत्रांत करायला सुरुवात झाली आहे. उद्या ती लाट सर्वत्र  पसरायला वेळ लागणार नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर फ़ोक्सकोन (Foxconn) या जगातील अवाढव्य कंत्राटी उत्पादक कंपनीचे घेता येईल. चीनमद्ध्ये २०११ साली या कंपनीचे दहा लाख कर्मचारी होते. याच वर्षी कंपनीने दहा हजार रोबो बसवले व "यंत्रमानवीकरणाची" सुरुवात केली. आता दरवर्षी तीस हजार रोबो बसवले जात आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेरी गौ म्हणतात कि हाच दर ते प्रतिवर्षी एक लाख रोबो एवढा वाढवनार आहेत. याचाच अर्थ दहा लाख कर्मचा-यांची गरजच राहणार नाही. अन्य कंपन्यांचीही हीच दिशा आहे. 

याचा अर्थ आम्हा भारतियांना आजच समजावून घ्यावा लागणार आहे. एकीकडे रोजगार कमी होतील हे जेवढे सत्य आहे तसेच दुसरीकडे एव्गळ्या क्षेत्रांत मानवी रोजगारही वाढतील असा आशावाद अनेक अर्थतज्ञ करतात. कोणाचा आशावाद अत्य्हवा निराशाआद खरा ठरेल याचे भवितव्य वर्तवता येणे शक्य नसले तरे यंत्रमानव व कृत्रीम बुद्धीमत्ता ही आव्हाने आहेत हेही मात्र खरे.

वरील बाबतीत नैतिकतेचा सिद्धांत चर्चीला जातो. माणसाची जागा कृत्रिम श्रमकौशल्ये व कृत्रीम बुद्धीमत्तेला घेऊ देणे हे नैतिक होणार नाही कारण त्यामुळे माणसांचीच गरज संपेल  व हे नैतिक व मानवीय होणार नाही असा युक्तिवाद केला जातो. या युक्तिवादात नक्कीच तथ्य आहे. परंतू नतिकतेचाच इतिहास पाहिला तर माणसाने आपल्या नीतितत्वांतही सोयीनुसार फरक केल्याचे आपल्या लक्षत येइल. संगणक क्रांती येण्याआधी भारतात तिला नैतिकतेच्याच पातळीवर विरोध करणारे, अगदी विद्यमान सरकारात असलेल्या पक्षासहित, अनेक होते हे आपल्याला माहितच आहे. पण नीतिमुल्ये बदलतात. कायदेही बदलतात. त्यामुळे भविष्यात कायद्यांचे अथवा नैतिक मुल्यांचे संरक्षण राहीलच असे नाही. ते वेळ येताच जाऊ शकते याचे भान आम्हाला असले पाहिजे. कोणतीही नीतिमुल्ये ही स्थिर नसतात. भविष्यातील मुल्ये काय असतील्क याबाबतही आपल्याला विचार करावा लागणार आहे. प्रवाहाबरोबर नुसते दैवगती समजत वहात रहायचे कि प्रवाहालाच दिशा देणारे व्हायचे हे आमच्याच हाती आहे.

शिवाय सारी कामे यंत्रांनी केली व माणसाला काही कामच राहिले नाही तर तो उत्पन्न मिळवणार कोठुन? जगणार कसा? तो बाजारातुन काय व कसे खरेदी करेल कारण खरेदी करायला उत्पन्न म्हणजेच क्रयशक्ती लागते. रोबोंना शारिरिक गरजाच नसल्याने तो काही केल्या "खरेदीदार" होणार नाही.  थोडक्यात संपुर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल. किंवा सर्व मानवी नागरिकांना फुकट वा अतिस्वस्त जीवनमान उपलब्ध करुन द्यावे लागेल. पण मग उद्योगांच्या नफेखोरीचे काय? नफ्याखेरीज ते कशाला उत्पादने करतील? किंवा असेही होईल कि रोबोटिक्सच्या वापरामुळे उत्पादनेच एवढी स्वस्त होतील कि अल्प रोजगारातही सर्वसामान्यांना सुखसमृद्ध जीवन जगता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. या सर्व शक्यतांवर आपल्याला सविस्तर विचार करणे भाग आहे कारण पुढील २०-२५ वर्षांत या सर्व घडामोडींत आपली भुमिका काय असेल, येणा-या परिस्थितीत आम्ही लाभाचे अधिक वाटेकरू बनत आमची किमान हानी कशी होईल याची रणनीति आम्हाला ठरवावीच लागेल. 

आजचा आमचा समाज मुळात शिक्षण म्हनजे काय व ते कसे द्यायला हवे याबाबतच चाचपडत आहे. आमचे सामाजिक प्रश्न अजुनही जातीपाती व धर्मधारित विवादांत अडकले आहेत. आरक्षण हाच आमच्या आजच्या सामाजिक गहन चर्चेचा व आंदोलनांचा विषय बनलेला आहे. आम्ही एवढे झापडबंद झालो आहोत कि आरक्षण ही एक सोय आहे, सामाजिक विकासाचा एकमेव मार्ग नाही हेही समजावून घेण्यात आम्हाला अपयश आले आहे. आमचे विचारवंतही त्याच प्रश्नांभोवती फिरत आपली विचार-रणनीति ठरवत आहेत. या सर्वांतून प्रगल्भ समाज निर्माण होण्याची प्रक्रिया कुंठित होत आहे. अशा वातावरणातून किंचित का होईना बाहेर येत भविष्यातील जगाचेही अवलोकन करत स्वत:ला सज्ज करण्याची आजच गरज आहे हे आम्हाला समजावून घेण्याची निकड आहे.

-संजय सोनवणी

Wednesday, January 27, 2016

मराठी कविता - महाराजा यशवंतराव होळकर


भारत भूमीच्या रक्षणाची, केली ज्यांनी गर्जना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।धृ।।

इंग्रजांना हरेक युद्धांत, ज्यांनी चारली हो माती
पळता भुई थोडी हे करती, इंग्रजांनी खाल्ली भीती
ज्यांच्या राष्ट्रकार्यामुळे, अभिमान वाटावा मना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०१।।

होळकरी काव्याने हे, महाराजा झुंजले किती
होळकरी बांडा झेंडा ज्यांनी, गाजविला भारती
ज्यांच्या पराक्रमापुढे झुकती, अजुनी सर्व माना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०२।।

एकाकी झुंजले परी, कधी नाही हार मानिली
सदा तलवारीच्या टोकावर, ज्यांनी आव्हाने पेलली
शिकवण ज्यांची सदा होती, ठेवा ताठ पाठीचा कणा
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०३।। 

देशभक्तीमुळे इतिहासात जे, अजरामर हो झाले
स्वातंत्र्याची प्रथम ठिणगी जे, मनी पेटवूनी गेले
ही स्तुतिसुमने वाहतो, मिलिंद ज्यांच्या चरणां
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०४।।​

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

'आम्ही धनगर' या कवितासंग्रहातून…

Tuesday, September 22, 2015

मराठी कविता - सुभेदार मल्हारराव होळकर (Subhedar Malharrao Holkar)



Milind Dombale (Deshmukh) । Marathi Kavita । Subhedar Malharrao Holkar
मिलिंद डोंबाळे (देशमुख) । मराठी कविता । सुभेदार मल्हारराव होळकर